'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची घोषणा
पुणे प्रतिनिधी- शंकर तिडके
पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी विराधी पक्षनेते अजित पवार मंचावरुन खाली उतरले. यावेळी अजित पवारांनी सांगितले की, "शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत एक समिती नेमण्यात येईल. ती समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल. असे शरद पवारांनी सांगितले आहे.”शरद पवार म्हणाले, “माझी सामाजिक कार्यातुन निवृत्ती नाही. सामाजिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. कुठे थांबायचं हे मला कळतं. खासदारकीची ३ वर्ष शिल्लक आहेत." पवारांच्या घोषणेनंतर प्रतिभा पवार याही भावुक झाल्या होत्या तर कार्यकर्त्याना अश्रु अनावर झाले. शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यात खळबळ उडाली आहे.
'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची घोषणा
१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्ष राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्ष अविरत सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करतो आहे.संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाअधिक लक्ष घालण्यावर भर असेल. याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे. युवक, युवती आणि विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील.
अध्यक्षपदाबाबत समिती
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं की, "रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो.” ते म्हणाले, "गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे." त्यांनी या समितीसाठी - प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसंच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन ही नावं सुचवली आहेत.
यावेळी जयंत पाटील यांच्यासह कार्यकत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गाडीसमोर आडवे होत गाडी अडवण्याचा प्रयत्न करत निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते.
