ठाणे ( प्रतिनिधी -सचिन घावट ) कल्याण येथील पश्चिम भागातील गोदरेज हिल बारावे भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचराभूमीला रविवारी दुपारी अचानक आग लागली. वाऱ्याचे वेग अधिक असल्याने आग वेगाने कचरा केंद्रावर पसरली. साठवण केलेला आणि उन्हाने वाळलेला कचरा आगीत खाक झाला.ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले.कचऱ्यामध्ये अनेक ज्वलनशील घटक असतात. अति उष्णतेने कचऱ्यामध्ये मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे कचरा केंद्राला आग लागते किंवा काही वेळा वाळलेल्या कचऱ्यातील धातू शोधण्यासाठी कचरा वेचक कचराभूमीला आग लावतात, असे अंदाज यापूर्वी काढण्यात आले आहेत.गोदरेज हिल परिसरातील कचराभूमीवर दुपारच्या वेळेत कोणीही नसताना अचानक आग लागल्याने ही आग कोणी लावला असा प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्राला गेल्या वर्षभराच्या कालावधीत लागलेली ही चौथी आग आहे. यापूर्वी आधारवाडी कचराभूमीला नियमित आगी लागत होत्या. आता बारावे येथील कचराभूमीलाही आगी लागत आहेत. या भागातील कचराभूमीला स्थानिकांचा विरोध आहे.
