प्रतिनिधी सचिन घावट
पालघर: पश्चिम किनारपट्टीला बीपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसत आहे. पालघर जिल्ह्यासमोरील खोल समुद्रातून हे वादळ आज संध्याकाळच्या सुमारास १६५ ते १७५ प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघरच्या किनारपट्टी भागांसह ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वारे वाहू लागले असून त्याचा जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना फटका बसत आहे. वाऱ्याचा वेग अंदाजे ताशी ४० ते ६० किमी इतका असून झाडे विद्युत खांब व इतर कारणांमुळे अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे पालघर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. दोन ते चार तासापासून शहरातील व काही ग्रामीण भागामध्ये वीज गायब झाली आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडलेले विजेचे खांब, पडलेल्या तारा, तारांवर पडलेली झाडे हटविण्याचे काम महावितरणच्या कर्मचारी वर्गामार्फत युद्धपातळीवर सुरू असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे अधिकारींनी म्हटले आहे. पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळी वारे वाहत असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. वादळी वाऱ्यामुळे वातावरणात सर्वत्र धुळीचे लोण पसरले आहेत. वाऱ्यांचा वेग वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन व हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
