खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी अर्जुन शेळके
पुणे दि १३ (प्रतिनिधी)- दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयालाच टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेचसरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे.या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

