पिकअप दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू, दोघे गंभी
शेख अन्सार
रिसोड : भरधाव पिकअप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज 19 जून रोजी दुपारी 4 वाजता रिसोड वाशिम मार्गावर नागठाणा जवळ घडली. मृतांमध्ये मामा भाच्याचा समावेश आहे.तिन्ही मृत रिसोड तालुक्यातील येवती येथील रहिवासी आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भानुदास शिंदे वय 17, दिनकर मारुती गायकवाड वय 25, अक्षय सखाराम जाधव वय 17 हे तिघेही दुचाकी क्रमांक एमएच 21 एके 1569 ने वाशिमहून आपल्या गावाकडे येत असताना रिसोडहून वाशिमकडे जाणाऱ्या एमएच 37 टी 2659 क्रमांकाच्या पिकअपला दुचाकीची धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत पिकअपमधील एकलासपूर तालुका रिसोड येथील गोपाल कुलाळ व बद्री कुलाल हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस याप्रकरणी कार्यवाही करत होते.
मयत दिनकर गायकवाड व अक्षय जाधव हे दोघे मामा भाचे असून ते त्यांचा मित्र गणेश शिंदे याच्यासोबत दुचाकीने येत होते.तिघेही तरुण शिकत होते. या धडकेनंतर दुचाकी जळून खाक झाली. आणि पिकअप रस्त्याच्या कडेला उलटली. यातील एक मृतक दिनकर गायकवाड याचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असल्याचे समजते

