'
अहमदनर अफसर शेख
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी हा उपक्रम” राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी त्यांना शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, यादृष्टीने दाखले वाटपाचे काटेकोर नियोजन करत या उपक्रमाची अहमदनगर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या स्पष्ट सूचना
'शासन आपल्या दारी' या उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी वैशाली आव्हाड आदी उपस्थित हाेते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून शिबिराद्वारे लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात यावे. याबाबत एकाही ग्रामस्थाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्या, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
