धोकादायक वृक्ष छाटणी दिरंगाई भोवली? पावसाच्या तुरळक सरीत शहरात ८ झाडांची पडझड

 

सचिन धावट प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने एप्रिल व मे महिन्यात मान्सून पूर्व वृक्ष छाटणीला सुरूवात करण्यात येते. या दरम्यान धोकादायक वृक्षांची गणना करून वृक्ष छाटणी केली जाते. मात्र यंदा जून महिना उजाडूनही धोकादायक वृक्ष यादी जाहीर करण्यात आली नाही, तसेच वृक्ष छाटणीलाही दिरंगाई झाली असून शहरात आद्यप वृक्ष छाटणी सुरू आहे. पहिल्याच पावसात आणि बीपरजॉय चक्रीवादळाने मंगळवारी शहरात ८ झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे वृक्ष छाटणी दिरंगाई भोवली अशी चर्चा सुरु असून ,पुढे मुसळधार पावसात झाडे कशी तग धरतील? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.नवी मुंबई शहरात अनेक विभागात जुनी झाडे आहेत. पावसाळ्यात सुसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊसामुळे झाडे धोकादायक ठरतात. नवी मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल ते मे या दरम्यान वृक्ष छाटणी पूर्ण होते मात्र यंदा अद्याप धोकादायक वृक्षांची यादीच जाहीर केली नसून शिवाय शहरात वृक्ष छाटणी ही सुरू आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांच्याकडून शहरातील धोकादायक वृक्षांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे शहरातील तीस वर्षे जुनी झाडे हटवण्याबाबत नागरिकांकडून मागणी केली जाते, त्याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत असते. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात मुळासकट झाडांची पडझड झाली होती. आता बीपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईसह नवी मुंबई, उपनगरात होत आहे. त्यामुळे सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी देखील बरसत आहेत. मंगळवार पासून ते सकाळपर्यंत शहरात आठ झाडांची पडझड झाली असून यामध्ये काही झाडे मुळासकट देखील उन्मळून पडली आहेत. नेरूळ मध्ये वाहनावर झाड पडल्याने वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील कलावधीत मुसळधार पावसात शहरातील झाडांची काय परिस्थिती होईल असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post