खा. नीलेश लंके यांचे आंदोलन यशस्वी; लेखी आश्वासनावर उपोषण मागे
अहिल्यानगर (प्रतिनिधी) –अर्जुन शेळके
नगर-मनमाड रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी खा. नीलेश लंके यांनी दिलेल्या बेमुदत उपोषणाला यश मिळाले असून, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले.
प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ठेकेदारास तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे, शनिशिंगणापूर फाट्यावर मिलिंगचे, तर देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू करण्यात आले. याशिवाय कणगर व पिंपरी निर्मळ येथे प्लँट आणि लॅबोरेटरीची उभारणीही झाली आहे.
खा. लंके यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाची तपासणी करून अहवाल दिल्यानंतर लेखी आश्वासनाची खात्री झाल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा इशारा
*काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदारावर* *नियमबाह्य कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासनात नमूद
*मुदतवाढ नाकारली
*खा. लंके यांनी ठेकेदारास मुदतवाढ देऊ* *नये, अशी ठाम मागणी केल्यानंतर त्याचा समावेशही आश्वासनात करण्यात आला*.
जनतेच्या दबावाचे यशस्वी रूपांतर
खा. लंके यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने तात्काळ हालचाली करत काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा जनतेच्या आवाजाचा आणि जनप्रतिनिधीच्या निग्रहाचा मोठा विजय मानला जात आहे.
