विज पडुन दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यु वाशिम जिल्ह्यातील घटना "




मालेगाव / सुरज अवचार

विजांचा कडकडाटात रविवारी (दि.४) वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू झाला.


रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे शेतकरी संदीप दत्ता काळदाते (३२) हे आपल्या शेतात उभे असताना, त्यांच्या अंगावर वीज पडली. विजेचा प्रवाह इतका होता की, या विजेच्या धक्क्याने त्यांचा चेहरा जमिनीमध्ये घुसल्याची माहिती मृतकाच्या नातेवाइकांनी दिली.


वीज पडल्यानंतर त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील नारायण गोविंदा कदम (३०) हे शेतात काम करीत असताना, दुपारी २ वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत कोयाळी जाधव (ता.रिसोड) येथे वीज अंगावर कोसळून दोन गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले तर चवथ्या घटनेत नंधाना (ता.रिसोड) येथील पांडुरंग निवृत्ती टाले यांच्या मालकिच्या दोन जनावरांवर वीज पडल्याने दोन्ही जनावरे दगावली. यामध्ये एक म्हैस आणि एक बैल होता. पंचनामा करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंग टाले यांनी केली. पाचव्या घटनेत भोकरखेड (ता.रिसोड) येथील ज्ञानेश्वर गोविंदा रंजवे यांच्या मालकिच्या दोन बैलांवर टिनपत्रे उडून पडल्याने दोन्ही बैल गंभीर जखमी झाले.

Post a Comment

Previous Post Next Post