रिसोड(प्रतिनिधी) :-
विद्यार्थी जीवनात अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास व प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे वर्ग दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांनी केले.
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 06 जून 2023 रोजी इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख, जितेंद्रकुमार दलाल, संजयकुमार जिरवणकर, माजी प्राचार्य डॉ.के.बी.देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण थोरात, उपप्राचार्य शिरीष माळोदे, उपमुख्याध्यापक विजयकुमार ढेंगळे, पर्यवेक्षक सुशील सोवीतकर, शिवाजी प्राथमिक मराठीचे मुख्याध्यापक सचिन देशमुख व शिवाजी प्राथमिक उर्दूचे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक स्व.ॲड आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना किरणराव सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी दहावी व बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते हे वर्ष त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीला वळण देणारे वर्ष असते. आजच्या काळामध्ये गुणवत्ता जरी वाढली असली तरी स्पर्धाही तितकीच वाढलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी न डगमगता आत्मविश्वास व मेहनत करण्याची जिद्द दाखविल्यास त्यांना इच्छित ध्येय गाठण्यास मदत होते.
यावेळी गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली व आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून व विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजीनियरिंग प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या शिवाजी स्कॉलर्स अकॅडमी चे संचालक डॉ.स्नेहदीपभैय्या सरनाईक यांना दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुशील सोवीतकर यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक अनिल मडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
