अफसर शेख प्रतिनिधी
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. मात्र, जून महिना अर्धा लाेटला, पावसाला सुरुवात न झाल्याने वरुणराजा कधी बरसणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच प्रचंड उकाडा वाढल्याने अंगातून घामाच्या धारादेखील वाहू लागल्या आहेत.
*कृषी विभागाचे आवाहन*
नगर जिल्ह्यात सरासरी साडेचार ते पाच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरा हाेताे. यंदाही तितकीच पेरणी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे खते, बियाणे आदींचे कृषी विभागाकडून नियाेजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाअभावी शेतकरी पेरणीसाठी खोळंबले आहेत. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होताना नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस नसल्याने रोजंदारीवर कामाला जाणाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने ते कामगारही कधी एकदा पाऊस पडतो, या आशेने रोज आभाळाकडे नजरा लावून आहेत.
