अहमदनगर अफसर शेख
माझी वसुंधरा अभियानात नगर महापालिकेची कायमच चांगली कामगिरी राहिली आहे. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत स्थानिक संस्थांची स्पर्धा झाली. त्यात तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये अहमदनगर महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. त्यामुळे नगर महापालिकेला सहा कोटी रुपयांचे पारितोषिक शासनाने जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नुकताच मुंबई येथे माझी वसुंधरा सन्मान साेहळा झाला. या साेहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, प्रभाग अधिकारी मेहेर लहारे, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
